डोंबिवली : रासायनिक कारखान्यांतून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे डोंबिवलीकर त्रासलेले असतानाच त्यावर तोडगा काढून दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांचे हित जोपासत त्यांना पुन्हा प्रदूषणाच्या गर्तेत ढकलणारा निर्णय घेत एक प्रकारे कारखानदारांना प्रदूषणासाठी मुभा दिल्याचा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली-अंबरनाथमधील कारखानाबंदी उठवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय डोंबिवलीत सुरू करावे, या कार्यालयातून २४ तास सेवा पुरवली जावी, एखादी घटना अपरात्री घडल्यास तेथे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी उपलब्ध असावा, औद्योगिक परिसरात वेगळे अग्निशमन केंद्र हवे, प्रदूषण नियंत्रणाचे कायदे कडक व्हावेत, औद्योगिक परिसरात येणाऱ्या रसायनांच्या टँकरची नोंद व्हावी आणि ते कुठून-कुठे जातात ते निश्चित करावे, उतरवलेल्या रसायनांची नोंद व्हावी, एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी, प्रदूषणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून घ्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात कारखाना निरीक्षक वाढवावे, रासायनिक व कापड उद्योग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर वेगवेगळी प्रक्रिया करावी, एमआयडीसी-प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालय आणि पोलिसांत समन्वय हवा, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित व्हाव्या, असे त्यांनी सुचवले.
कारखानाबंदी उठवल्याने प्रदूषणास मुभा
By admin | Published: August 12, 2016 2:13 AM