बदलापूर : शाडूच्या गणेशमूर्तींची किंमत जास्त असतानाही केवळ त्यांची निर्मिती करून विक्री करण्याचे काम बदलापुरातील एक मूर्तिकार करत आहे. पर्यावरणसंवर्धनाचा विचार करूनच त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. पाच वर्षांपासून ते केवळ शाडूच्याच मूर्तींचा व्यवसाय करत आहेत.बदलापूर पूर्वेला सरस्वतीनगरातील सावरकर सदनिका येथे फक्त शाडूच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्र ी करत वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न रवींद्र कुंभार करत आहेत. अनेक भाविक पर्यावरणाबाबत संवेदनशील होत असल्याने प्लास्टर आॅफ पॅॅरिसच्या मूर्तींऐवजी आता शाडूच्या मूर्तींचीदेखील मागणी वाढत आहे. शाडूच्या मातीचा वाढता दर आणि मूर्ती घडवण्यासाठी येणारा खर्च या सर्व बाबी लक्षात घेता शाडूच्या मूर्ती या महाग असतात. शेतातील माती, शाडूची माती आणि सुकलेल्या पालापाचोळ्याच्या मिश्रणातून कुंभार मातीच्या मूर्तींची निर्मिती करतात. शाडूच्या मूर्ती सामान्यपणे जड असतात. यासाठीच शाडूच्या मातीसोबत सुकलेला पाला आणि शेतातल्या मातीचे मिश्रण टाकून ते वजनास हलके करण्याचा प्रयत्न कुंभार यांनी केला आहे. सात ते आठ वर्षांपासून त्यांनी प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्याचे काम थांबवले आहे. या शाडूच्या आग्रहामुळे आम्हाला मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागते. मात्र, आम्ही तयार केलेली एक ते दीड फुटी मूर्ती फक्त अर्ध्या तासात विरघळते. त्यामुळे नदीत विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी होणारी विटंबना या मूर्तींच्या वाट्याला येत नाही, असे कुंभार यांनी सांगितले.
केवळ शाडूच्या मूर्तींची विक्री करणारे गणेश कला केंद्र
By admin | Published: August 30, 2016 2:35 AM