नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख जलाशयामधील पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोग यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ३० मे पासून पाच टक्के तर ५ जून पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे भिवंडी शहरात ज्या भागात बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून पाणीपुरवठा होतो त्या भागात ५ जून पासून पुढील आदेश येई पर्यंत कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे .अशी माहिती भिवंडी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.तरी शहरातील बहुसंख्य भागात पाणी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा तसेच काटकसरीने पाणी वापरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.