लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना साेयी-सुविधा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासन, राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये लाेकलच्या वाढीव फेऱ्या, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग, कर्जत-कसारा मार्गातील तांत्रिक अडथळे व रेल्वे अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत. नवीन रेल्वे स्थानकांचा पाठपुरावा, अन्य रेल्वे संघटनांशी समन्वय, आदी मुद्द्यांवर महासंघ लक्ष केंद्रित करणार आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर-टिटवाळा १५ डबा लोकल सुरू करणे, पाचवी, सहावी लाईन सुरू झाल्यावर ठाणे वा कल्याणवरून कर्जत, कसारा रेग्युलर शटल सुरू करणे, सामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी पॅसेंजर गाड्यांना जनरल डबे वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, मुंबई ते ठाणे लोकलपैकी काही लोकलचा विस्तार दिवा स्थानकापर्यंत करावा, ज्या मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्या मागणी करूनही कल्याणला थांबविल्या जात नाहीत, त्या पनवेलमार्गे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून कर्जत लोकलची संख्या वाढेल.
‘प्रवासी संघटनांनी एकजुटीले काम करावे’
सर्व रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका व वनरूपी क्लिनिक यासाठी प्रयत्न करणे, वांगणी टर्मिनल स्थानक, गुरवली स्थानक, नवे पलावा स्थानक, दिवा-वसई उपनगरीय लोकल आणि अत्यावश्यक ठिकाणी रोड ओव्हरब्रिजची मागणी, तसेच प्रसाधनगृह फलाटांची उंची, तिकीट खिडकी पाणीसुविधा शेड अशा सुविधांसाठी स्थानिक प्रवासी संघटनांनी एकत्र प्रयत्न करावेत. अडचणी आल्यास महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.