कल्याण : केडीएमटीच्या बसला आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका बसला आग लागली. हा प्रकार रेल्वे स्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या कल्याण बस आगारात घडला. आयशर कंपनीच्या बसला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनांना कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी परिवहन सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे आणि आयुक्त ई रवींद्रन यांच्याकडे केली आहे. इंजिनमधील वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोहने-कल्याण मार्गावर जाणारी आयशर कंपनीच्या मिडी बसला आग लागल्याची घटना मुरबाड रस्त्यावर २९ जुलैला घडली होती. त्यावेळी बसमध्ये १२ प्रवासी होते. परंतु चालक आणि वाहकांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने आगीचे प्रमाण फारसे वाढले नाही. त्याचबरोबर कोणालाही दुखापत झाली नाही. बसमधील अग्नीरोधक यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याआधी २१ जुलैला उपक्रमाच्या गणेशघाट आगारात उभी असलेली बस सुरु करताना बसने पेट घेतला होता. ही बसही आयशर कंपनीचीच होती. सोमवारी ज्या बसला आग लागली ती देखील आयशर कंपनीचीच होती. ही घटना रात्री दहाच्या सुमारास कल्याण बस आगारात केडीएमटीच्या थांब्यावर कल्याण-उंबर्डे या बसमध्ये घडली. यावेळी चालक मोहन खुरंगळे आणि वाहक शांताराम घोडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वारंवार घडलेल्या आगीच्या घटना पाहता आयशर कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
केडीएमटीच्या बसला पुन्हा आग
By admin | Published: August 10, 2016 2:50 AM