कल्याण : केडीएमटीच्या ताफ्यातील चालकांविना धुळखात पडलेल्या बस आता लवकरच रस्त्यांवर धावणार आहेत. या उपक्रमातील नव्या १८५ बससह जुन्या ८० बससाठी चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. जुन्या बससाठी १०० चालकांच्या भरती संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी दाखल झालेल्या चार निविदांपैकी तीन निविदा पात्र ठरल्या आहेत. आठवडाभरात भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटीसाठी १८५ बस मंजूर झाल्या आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धुळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटून पालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालकाविना नागरिकांना सेवेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बसना मंजुरी मिळाली आहे, परंतु निधीअभावी त्या अजूनही दाखल झालेल्या नाहीत. उपक्रमातील जुन्या बससाठीही चालकांची भरती केली जाणार आहे. १०० चालकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी चौघांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील तीन निविदा पात्र ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)
केडीएमटीची आॅनलाइन कंत्राटी भरती
By admin | Published: August 17, 2016 2:29 AM