शहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी रेवती गायकर आणि तहसीलदार अविनाश कोष्टी यांना संतप्त शेतकऱ्यांनी गावच्या वेशीवर अडवले. ‘चले जाव’च्या घोषणा देत संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले.महाराष्ट्र शासन आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या द्रुतगती महामार्गाच्या २७ किमी अंतरासाठी शहापूर तालुक्यातून अंदाजे ४०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शहापूर तालुक्यातील २७ गावांमधून हा महामार्ग जात असून यात आर्जुली, आंदाड, हिव, रास, सरलांबे, शेलवली, सापगाव, खुटघर, शेलवली, कासगाव, शिरोळ, शेई, चांदे, मढ धसई, कासगाव, गोलभन, दळखण, बिरवाडी, खुटारी, रातअंधळा, कसारा, वाशाळा, विहीगाव या गावांचा समावेश आहे. पुनर्वसनाबाबत शेतकऱ्यांसमोर असलेल्या पर्यायांची माहिती देण्याकरिता तहसीलदार कोष्टी आणि भूसंपादन अधिकारी रेवती गायकर धसई गावात शिरत असताना शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. ‘अधिकाऱ्यांनो चालते व्हा’, ‘रस्त्यासाठी जमीन देणार नाही’, ‘भातसा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परतवून लावले. तसेच समुपदेशन करणाऱ्या तिघाचौघांना जमावाने धक्काबुक्की केली. माजी आमदार दौलत दरोडा, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, महिला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष अपर्णा खाडे आदी या वेळी उपस्थित होते. तहसीलदार कोष्टी म्हणाले की, या महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला ग्रामस्थांनी जाऊ दिले नाही. विरोध करणारे नेमके लाभार्थी होते की अन्य कोणी, हे समजू शकले नाही, असे ते म्हणाले.
भूसंपादन अधिकाऱ्यांना रोखले
By admin | Published: August 30, 2016 2:42 AM