डोंबिवली : मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे साहित्यातील कंपूशाहीला छेद देणारे व्हावे. त्याचे आयोजन हे एक आदर्श ठरावे, अशी अपेक्षा डोंबिवलीतील ज्येष्ठ साहित्यिका लीला शहा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. शहा पुढे म्हणाल्या की, ‘खऱ्या साहित्यिकांना या संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. भव्य आणि दिव्य आयोजनात खऱ्या साहित्यिकाची उपेक्षा होते. त्याला फारसे स्थान दिले जात नाही. काही प्रसंगी तर त्याला साधे कळविण्याची तसदीही घेतली जात नाही. संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी खऱ्या साहित्यिकांना विचारात घ्यावे. त्यांना संमेलनाविषयी काय वाटते, त्यात काय असावे आणि काय असू नये, याचा विचार घ्यावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कमी असावा,’ अशीही सूचना शहा यांनी केली आहे.शहा या डोंबिवलीत ३० वर्षांपासून राहत आहेत. आतापर्यंत विविध विषयांवरील त्यांची ५६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य सरकारचा उत्कृ ष्ट वाङ्मयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शहा म्हणाल्या की, अनेक लेखक प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तके छापतात. मात्र मी कसे कधीच केले नाही. प्रकाशक माझ्याकडे स्वत:हून आले. मानधन देऊन माझे लेखन प्रकाशित केले. मात्र, डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाने माझ्या काव्य लेखनाची दखल घेतलेली नाही. माध्यमांनी शहरातील अनेक साहित्यिकांची दखल घेतली आहे. मात्र, माझ्या कामाची दखल घेतली नाही,’ अशी खंत शहा यांनी व्यक्त केली. ५० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहा सहभागी झाल्या होत्या. तेथेही त्यांची दखल घेतली गेली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर दखल न घेतल्याची जाणीव झाल्याचे आयोजकांनी बोलून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील संमेलनात स्थानिक साहित्यिकांची दखल घेतली जावी. त्यांना संमेलनात योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे.
संमेलन कंपूशाहीला छेद देणारे असावे
By admin | Published: October 12, 2016 4:07 AM