ठाणे : चेंदणी कोळीवाड्यात पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जाण्याचे यंदाचे १५ वे वर्ष असून चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच व चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट यांच्यावतीने ठाणे खाडीतून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू व्हावी यासाठी ठाणे खाडीची परिक्रमा करण्याचा संकल्प केला जाणार आहे. ही योजना वर्षभर राबविली जाणार आहे. चेंदणी कोळीवाड्यात पूर्वापार नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे. परंतु ठाणे खाडीतील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे नष्ट होत गेलेली मासेमारी यामुळे हा उत्सव साजरा करण्याची परंपरा खंडीत झाली. हा व्यवसाय पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने खंडीत पडलेली परंपरा १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ती आजतागायत सुरू आहे. बुधवारी चेंदणी कोळीवाड्याच्या या उत्सवाला १५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने चेंदणी कोळीवाड्यातील कोळीबांधव अभिनव संकल्प करणार आहेत. बुधवारी वाजत गाजत, ब्रास बॅण्डसह चेंदणी कोळीवाड्यातून मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी पूर्व-पश्चिम चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधव-भगिनी ‘सण आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा...’ असे म्हणत मोठ्या उत्साहाने या मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. सायं. ५ वा. निघणारी ही मिरवणूक पूर्व- पश्चिम चेंदणी कोळीवाड्यातून फिरुन कस्टम जेटीजवळ येणार आहे. मिरवणुकीत असणाऱ्या पालखीत सोन्याचा वर्ख लावलेला नारळ ठेवला जाणार आहे. कस्टम जेटीजवळ आल्यावर नवदाम्पत्यांच्या हस्ते हा नारळ अर्पण करुन पूजा केली जाणार आहे. या मिरवणूकीत कोळी नृत्य देखील सादर केली जाणार आहे. कोळी संस्कृतीचे पारंपारिक दर्शन ठाणेकरांना या उत्सवाच्या निमित्ताने बुधवारी घडणार आहे. (प्रतिनिधी)
ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्तीची परिक्रमा
By admin | Published: August 17, 2016 2:49 AM