ठाणे : ठाणे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील ४५० गणेशोत्सव मंडळांना पालिकेने प्रत्येकी एक लाखाची दंड भरण्याच्या नोटीसा अचानक मागे घेतल्यानंतर आता यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे हा दंड माफ झाल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. तर आम्ही मध्यस्थी केल्यानेच हा दंड माफ झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. यातूनच आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांनी आतापासूनच प्रचाराची सुरुवात केल्याचे दिसत आहे. रस्त्यात गणेशोत्सव साजरा केल्याप्रकरणी ठाणे महानगर पालिकेने शहरातील ४५० हुन अधिक मंडळांवर दंडात्मक कारवाईची सुरवात करुन दंडाची ही रक्कम न भरल्यास मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसाही बजावल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेऊन दंड भरणार नसल्याचे सांगून वेळ पडल्यास रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करु, असा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात पालिकेने आता या नोटीसा मागे घेण्यास सुरवात केली. परंतु, त्या मागे घेण्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे यांनी मध्यस्थी केल्यानेच हा दंड माफ केल्याचे प्रसिद्ध पत्रकच शिवसेनेकडून काढले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीनेदेखील आता या निर्णयाचे स्वागत करतांना आम्ही जी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळेच मंडळांना गणेशोत्सव निर्विघणपणे साजरा करण्यास मिळणार असल्याचा दावा केला आहे.राजकीय पोळी भाजण्याचा नेत्यांचा प्रयत्न - ठाणे शहरात आजघडीला ५५० हून अधिक छोटी मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील काही काही मंडळांना बड्या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. तर काही मंडळे निवडणुकीच्या तोंडावर बडा मासा हाती लागतो का? यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात. - प्रत्येक मंडळात १५ ते ३० जणांचा चमू असल्याने एकूण मंडळांच्या कार्यकर्त्यांचा विचार केल्यास, त्यांच्याकडून अधिक प्रमाणात प्रचार सुद्धा होऊन आपली राजकीय पोळी सुद्धा भाजली जाऊ शकते. - या हेतूनेच आता शहरात गणेशोत्सवाच्या नावावर श्रेयाचे राजाकरण सुरु झाले आहे. येत्या काळात हे श्रेयाचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे असून ते कोणत्या थराला जाईल, हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
मंडळांच्या दंड माफीवरुन ठाण्यात राजकारण तापले
By admin | Published: August 18, 2016 5:15 AM