बदलापूर : मुंबईहून बदलापूर-कर्जतला येणाऱ्या गाड्यांना ठाणे-डोंबिवलीत थांबा देऊ नये, प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी, गर्दीच्या वेळी दोन गाड्यांमधील अंतर कमी करावे, बदलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांत उल्हासनगर आणि अंबरनाथहून बसून येणाऱ्या प्रवाशांना रोखावे, गाड्यांना कोणत्याही कारणाने विलंब होत असेल, तर त्याची माहिती लागलीच उद्घोषणेच्या माध्यमातून द्यावी... या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रवाशांचा अंत पाहणाऱ्या मागण्या शुक्रवारी डीआरएमसमोर मांडण्यात आल्या.मेगाब्लॉकच्या दिवशी तांत्रिक कामांसोबत रेल्वे गाड्यांचीही दुरुस्ती करावी, सकाळी ८.११ ची लोकल फलाट क्रमांक-३ ऐवजी क्रमांक-१ वर आणावी, कमी सीट असलेल्या लोकल बदलापूर-कर्जतसारख्या लांबच्या प्रवासासाठी सोडू नयेत, बदलापूर स्थानकात शेड उभारावी, कर्जत दिशेकडे पादचारी पूल उभारावा, गर्दीच्या वेळेत लोकलला आडव्या येणाऱ्या एक्स्प्रेस आणि मालगाड्यांना मार्ग देऊ नये, हे मुद्देही मांडण्यात आले. या तासाभराच्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांचा प्रतिसाद थंड-पुरेसा नसल्याने प्रवाशांचे प्रतिनिधी आक्रमक झाले. त्यामुळे डीआरएम अमिताभ ओझा यांनी सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १९ आॅगस्टला बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीला केवळ प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना न बोलवता प्रवाशांच्या प्रतिनिधींनाही संधी देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले.आंदोलन करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिनिधींपैकी अश्विनी सावंत, सविता दूधवडकर, शिल्पा पाटकर, जयश्री शिंदे, रिगल गजबी, प्रज्ञा गायकवाड यांच्यासह अनेक तरुणांनी या चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)
बदलापूर गाड्यांचे थांबे कमी करा
By admin | Published: August 13, 2016 3:57 AM