ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरून मोहमद जैद मंजूर खान (३०) याच्यावर चाकूने तसेच रिव्हॉल्व्हरने हल्ला करणाऱ्या दोघांपैकी मोहन मल्लेश माचारला (२२, रा. गोकुळनगर, ठाणे) याला राबोडी पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अटकेतील शब्बीर शेख आणि मोहन या दोघांनाही २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या खान यांच्यावर शब्बीर आणि मोहन या दोघांनी मंगळवारी दुपारी चाकूचे वार करुन तसेच रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून हल्ला केला होता. यात गोळी चुकल्याने सुदैवाने यातून ते बचावले. मंगळवारी दुपारी राबोडीतील तपासेनगर या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेल्या खान यांना मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह शब्बीरने धरला. खान यांनी त्यास विरोध केला. याच रागातून शब्बीर आणि त्याच्या साथीदाराने खान यांना मारहाण केली. त्यानंतर शब्बीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. तसेच पिस्तूल मधून एक राउंड खान यांच्या दिशेने फायर केला. मात्र, गोळी चुकल्याने खान थोडक्यात बचावले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तसेच हत्यार प्रतिबंधक कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या पथकाने अवघ्या २४ तासातच अगोदर शब्बीरला त्यापाठोपाठ मोहन माचारला ही अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल हस्तगत केले. हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
........
वाचली