शहापूर - ठाणे जिल्ह्यातील अल्पावधीत लोकप्रिय झालेला प्रसिद्ध गायक बाळा रतन दिवे उर्फ बाळ्या सिंगरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बाळा दिवेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली असून बाळा दिवेच्या मृत्यूचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गुरुवारी रात्री सोनुभाऊ बसवंत कॉलेज जवळील पळपाडा येथील बाळ्या सिंगर नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला होता. मात्र काही वेळाने बाळा दिवेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाला. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागली. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो अशी शंकाही अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र बाळा दिवेच्या एक्झिटमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी बाळ्या सिंगरला भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. बाळा दिवे याचे गाणे नेहमी आठवणीत राहतील अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केली. आगं पोरी तू स्वप्नात ये ना या गाण्यामुळे बाळ्या सिंगर अल्पावधीतच प्रसिद्ध झाला होता. बाळा दिवेच्या मृत्यूबाबत शहापूर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
आदिवासी समाजातील बाळ्या सिंगरने त्यांच्या गाण्यानं वेगळी ओळख निर्माण केली होती. बाळ्या सिंगरच्या मागे कुटुंबात त्याची पत्नी आणि ४ मुले आहेत. शहापूर तालुक्यातील आसनगाव इथं वालसेत गावात तो राहत होता. वीटभट्टीवर मजुरी करून, मासेमारी करून कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. वयाच्या १२ व्या वर्षीपासून बाळा दिवेला गाण्याची आवड निर्माण झाली होती. त्याच्या आईनं आगरी कोळी, आदिवासी गाण्याच्या कॅसेट आणून दिल्या होत्या. शहापूर तालुक्यात बाळ्या सिंगर म्हणून त्याने नाव कमावलं होतं. केवळ शहापूर तालुक्यातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात बाळ्या सिंगरच्या आवाजाने भूरळ घातली होती.
मासेविक्री करत बाळ्या सिंगर गावागावात जाऊन गाणे म्हणत होता. त्याच्या वेगळ्या शैलीने ग्राहकही त्याच्याकडे आकर्षित होत. तालुक्यात कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा क्रिकेटचे सामने असल्यास बाळ्या सिंगरला हमखास बोलावलं जाई. मात्र २७ ऑक्टोबरला बाळ्या सिंगरच्या अचानक मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला. आदिवासी समाजातील हरहुन्नरी कलाकार आज आपल्यात नाही अशी खंत समाजातून व्यक्त होत आहे.