मुंबई : सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळया महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. बहुधा पोलिसांचा धाक नसल्याने या गंभीर गुन्हयांची महाराष्ट्रात सर्वाधिक नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर लोकसंख्येच्या मानाने ही गुन्हेगारी राज्यात झपाटयाने वाढते आहे. पर्यायाने चोरी झालेल्या मालमत्तेतही राज्य पहिल्या स्थानी येऊन पाहोचले आहे.मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबईत तर दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात. प्रत्येक गुन्हयात सरासरी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मारले जातात. विशेषत: या गुन्हयांमधले लक्ष्य हे रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या स्त्रीया आहेत. आज एक तोळे सोन्याची किंमत २६ हजारांच्या आसपास आहे. तीन तोळयाचा दागिना चोरी झाला तर तो फटका कोणत्याही स्तरातल्या कुटुंबाला सोसणारा नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी महाराष्ट्रात सोनसाखळी चोरीसोबत अन्य जबरी चोरीचे ९४६६ गुन्हे घडले. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून तिथे ६४६४ तर तिसऱ्या स्थानी असलेल्या उत्तरप्रदेशात ३९२० गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे ३ जबरी चोरीचे गुन्हे हा संपूर्ण देशभरातील सरासरी दर आहे. हाच दर महाराष्ट्रात ८ इतका आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दरोडेही महाराष्ट्रात सर्वाधिक पडले. गेल्यावर्षी दरोडयांचे ८८५ गुन्हे घडले. त्यातल्या १३ गुन्हयांमध्ये दरोडेखोरांनी १५ जणांची हत्या केली. देशातला दर ०.४ इतका असून राज्यात तो दुप्पट म्हणजेच ०.८ इतका आहे. महाराष्ट्रानंतर ओडीशात ४८४, कर्नाटक-उत्तरप्रदेशात २९० दरोडयाचे गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्रात घरफोडयांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत मोठे आहे. गेल्यावर्षी राज्यात ३७२५ इतक्या घरफोडया घडल्या. दिल्लीत ३४२६, गुजरातेत २८३९ घरफोडीच्या गुन्हयांची नोंद झाली. चोरी या प्रकारात एनसीआरबीने मोबाईल चोरी, पाकिटमारीपासून वाहनचोरीपर्यंतचे गुन्हे एकत्रित केले आहेत. चोरीत दिल्ली देशात सर्वोच्च आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ७८७५३ तर महाराष्ट्रात ५६२८३ चोरीच्या गुन्हयांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमधील चोरीचा दर हा दरलाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ३८८.३, ४७.८ इतका आहे. मात्र देशातील चोरीच्या गुन्हयांचा दर हा ३५.४ इतका आहे. चोरीच्या उददेशाने घरात घुसणे, चोरी करणे या गुन्हयातही महाराष्ट्रच एक नंबरवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्याहून कमी गुन्हे घडले आहेत. या गुन्हेगारीचा दर पाहिल्यास दिल्ली महाराष्ट्रापेक्षा जास्त असुरिक्षत आहे. देशातील सरासरी दरापेक्षा महाराष्ट्रातलीही गुन्हेगारीही वाढली आहे.
चोर, दरोडेखोर पोलिसांच्या हाताबाहेर !
By admin | Published: August 21, 2015 2:18 AM