ठाणे : ठाणे मेट्रोचे काम, विस्तारित ठाणे स्टेशन उभारण्याबरोबरच एमएमआरडीएने ठाणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एक हजार कोटी देण्याचे मान्य केल्याने लवकरच जिल्ह्यातील कोंडी फुटेल, अशी आशा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते.राज्यातील ४० मोठ्या शहरांपैकी नऊ शहरे एका ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथील कोंडी फोडण्यास प्राधान्य मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्याचा, आदिवासींना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जिल्ह्यातील देशमुख आणि रायकर या पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. याशिवाय, पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवत्ताप्राप्त निबंध आणि चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही झाला. कार्यक्रमाला ठाण्याचे महापौर संजय मोरे, खा. राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते.
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हजार कोटी
By admin | Published: August 16, 2016 4:54 AM