डहाणू/सफाळे : ट्रेकिंगची आवड असलेले मुंबईतील तीन मित्र रविवारी सकाळी सफाळा येथील पूर्वेकडील तांदुळवाडी किल्ल्यावर गेले होते. मात्र सायंकाळच्या परतीच्या वेळी रस्ता चुकल्याने ते येथील घनदाट जंगलात भरकटले जाऊन संकटात सापडले होते. याची माहिती मिळताच सफाळे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात तब्बल पाच तास संबंध जंगलात सर्च आॅपरेशन करुन तिघांची सुखरूप सुटका केली. अभिजित मांजरेकर (२९) रा. नवीमुंबई, चंदन ठाकूर (२५) रा. गोरेगाव आणि ओमकार पळसे (२५) रा. विरार हे तिघेही मित्र. अभिजित व चंदन टीसीएस या कंपनीत कामाला असून ओमकारही एका खाजगी कंपनीत काम करतो. या तिघांनाही ट्रेकिंगची अत्यंत आवड. त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत जेजुरी, कळसूबाई शिखर अशा विविध गड किल्ल्यांवर आपली ट्रेकिंगची आवड जोपासली. त्याच अनुषंगाने या तिघा मित्रांनी सफाळे पूर्वेकडील घनदाट जंगलातील तांदुळवाडी किल्ला निवडला. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळीच साधारण ७ वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी फाट्याजवळील पायवाटेने त्यांनी चढाईस सुरुवात केली. दिवसभर संपूर्ण किल्ल्यासह येथील निसर्गरम्य परिसराचा व पावसात भिजण्याचाही त्यांनी पुरेपूर आनंद लुटला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी परतीचा मार्ग धरला खरा, परंतु ढगाळ वातावरणामुळे लवकरच सर्वत्र अंधार पडला. तिघेही भराभर आल्यापावली परतु लागले खरे. मात्र सतत तीन ते चार तास चालूनही ते किल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकले नाही. त्यानंतर झपाझप परतीचा प्रवास सुरु केला मात्र पावसाने दगा दिला आणि थोड्याच वेळात त्यांना रानभूल पडली. पोलीस व ग्रामस्थांच्या तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर ते एका दरीत पोहोचल्याचे आढळून आले. या सर्च आॅपरेशनच्या यशा बद्दल कौतुक केले जात आहे. (वार्ताहर)
भरकटलेल्या तीन ट्रेकर्सची मध्यरात्री जंगलातून सुटका
By admin | Published: August 09, 2016 2:14 AM