Ambernath Murder: अंबरनाथमध्ये भरदिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली. या महिलेने आपल्याच मित्राला अडीच लाख रुपये उसने दिले होते ते पैसे तो परत करीत नसल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता या वादातूनच तिच्याच मित्राने तिची हत्या केली.
अंबरनाथच्या बारकूपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने ती १३ वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमाने राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्याने तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता.
या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलने अखेर सीमाचा काटा काढायचे ठरवले. सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो आज दुपारी भेटला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला. दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तिचा तिथे मृत्यू झाला. सीमाच्या पोटावर, ओटीपोटाकर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आले होते. यामुळे ती वाचू शकली नाही. दुसरीकडे राहुल भिंगारकर याला पोलिसांनी अटक केली आहे.