लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. अशा वातावरणात गुरुवारी सकाळपासून नेवाळी आणि परिसरातील महिला अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच तहसीलदार कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. नेवाळीत शेतकऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस आणि शेतकरी यांच्यातील तणाव आणखीनच वाढला आहे. त्यातच सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नसल्याने आता येथील ग्रामस्थ आणखी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच, आपल्या मागण्या सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी नेवाळी आणि परिसरातील सर्व गावांतील महिला या तहसीलदार कार्यालयावर दुपारी ३ वाजता मोर्चा काढणार आहेत, असा मेसेज सर्वत्र फिरला होता. अनेक सोशल ग्रुपवरही हा मेसेज आला होता. यासंदर्भात तहसीलदार प्रशांत जोशी यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारच्या मोर्चाचे कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अचानक मोर्चा धडकलाच, तर गोंधळ होऊ नये, यासाठी या मोर्चाची कल्पना पोलिसांना देण्यात आली. मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसली, तरी तणावाचे वातावरण पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांनीदेखील पोलिसांचा मोठा ताफा तहसीलदार कार्यालयात बंदोबस्तासाठी पाठवला. दुपारी ३ वाजता मोर्चा येणार, असा संदेश असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली होती. सुरक्षेचे सर्व उपाय योजले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांनी या मोर्चाची वाट पाहिली. मात्र, महिलांचा मोर्चा न आल्याने पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला. अखेर, महिलांचा मोर्चा ही एक अफवा असल्याचे समोर आले.
महिलांचा मोर्चा अफवाच ठरली
By admin | Published: June 30, 2017 2:44 AM