अयोध्या : वर्षातील 365 दिवस रामनगरी अयोध्येत भाविकांची गर्दी असते. मात्र, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून ही गर्दी अनेक पटींनी वाढली आहे. यासोबतच दानपेटीत येणाऱ्या देणग्यांचे प्रमाणही वाढले आहे. यावेळीही, राम मंदिराला दरमहा सरासरी 2 ते 3 कोटी रुपयांची देणगी कोणत्याही प्रयत्नाशिवाय मिळत आहे. याशिवाय, रामनवमी, सावन झुला मेळा, पौर्णिमा स्नान आणि परिक्रमा जत्रेदरम्यान ही रक्कम तीन पटीने वाढते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातून दररोज मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येला पोहोचत आहेत.
अयोध्येत येणारे भाविक आपापल्या परीने रामलल्लाला स्वेच्छेने दान देत आहेत. याशिवाय, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडूनही देणगीसाठी प्रयत्न केले जात आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे जनजागृती आणि सहभाग अभियान चालवले जात आहे. तर स्वेच्छेने देणगी देण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. या अभियानात लोकही उत्साहाने सहभागी होत आहेत. एका अंदाजानुसार, या मोहिमेमुळे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत 3500 ते 5000 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय, शेकडो किलो सोने आणि हजारो किलो चांदीचे दागिनेही रामलल्लाला दान करण्यात आले आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट संबंधित एका हिंदी न्यूज चॅनेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 10 वर्षे राम मंदिराचे बांधकाम असेच सुरू राहिल्यास निधीची कमतरता भासणार नाही. त्यासाठीचा निधी आत्तापर्यंत जमा झालेल्या रकमेतूनच भरला जाणार आहे. याचबरोबर, सरयूमध्ये स्नान केल्यानंतर रामभक्तांना थेट मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी मार्गाचा आराखडाही आखला जात आहे. तसेच, मंदिर बांधल्यानंतर येथे एकावेळी 70 हजार भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.