कंत्राटदाराचा गैरप्रकार : जलयुक्त शिवारच्या कामाचा फज्जा लोकमत न्यूज नेटवर्क झडशी : शासन जलयुक्त शिवार या योजनेवर कोट्यवधींचा खर्च करीत आहे. अनेक ठिकाणी याचा फायदाही होत आहे; पण कमाईच्या नादात कंत्राटदार सूमार दर्जाचे काम करतात. याचा प्रत्यय उमरगाव येथे आला असून एकाच पावसात बंधाऱ्याच्या कडा वाहून गेल्या आहेत. उमरगाव परिसरात लघुसिंचन विभागाद्वारे मागील वर्षी साठवण बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. नदीच्या दोन्ही कडा खोदून खोलीकरण व रूंदीकरण केले. या कामामुळे तीन पिढ्यांपासून पडिक असलेली शेती वहिवाटीखाली आली. काही कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली. या कामांचा शेतकऱ्यांना फायदा झाला; पण नदीला धरणाचे पाणी येण्यापूर्वी एकाच पावसाने बंधाऱ्याच्या कडा वाहून गेल्या. याबाबत शेतकऱ्यांनी लघुसिंचन विभागाकडे तक्रारी केल्या. यावरून अधिकाऱ्यांनी सूचनाही केल्या; पण कंत्राटदार जुमानत नसल्याचेच दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
एकाच पावसात वाहून गेला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:43 AM