कृषी विभागाचा भोंगळ कारभार नारायणपूर : समुद्रपूर तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून सन २००८-०९ मध्ये गोविंदपूर-नारायणपूर या नाल्यावर विदर्भ पॅकेज अंतर्गत साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांची आता दैना झाली आहे. शिवाय जलयुक्त शिवारात या नाल्याचे सरळीकरण झाल्याने येथे पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. परिणामी या तुटक्या बंधाऱ्यातून पाणी वाहून ते आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. ज्या नाल्यावर हा बंधारा होता त्या नाल्याचे आता ‘जलयुक्त शिवार’ अभियानात खोलीकरण व नाला सरळीकरण करण्यात आले. यावर शासनाचा मोठा निधी खर्च झाला; परंतु सदर नाल्यावरील सिमेंट बंधारे (चेक डॅम) मात्र शेवटची घटका मोजत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर यांना विचारणा केली असता दुरूस्तीकरिता कोणताही निधी नसल्याचे सांगितले. सदर नाला खोलीकरण झाला असून चेक डॅमचे काम पूर्ण न केल्यास नाल्याजवळील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्याच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना कराव्या अशी मागणी आहे.(वार्ताहर)
सिमेंट बंधाऱ्यांची दैना
By admin | Published: May 06, 2017 12:34 AM