जोपासली सामाजिक बांधिलकी : दिले संसारोपयोगी साहित्य सेलू : अचानक लागलेल्या आगीत किशोर आडकुजी भगत यांच्या घरातील साहित्यासह धान्यसाठा जळून कोळसा झाला. परिणामी, त्यांचा संसार उघड्यावर आला होता. भगत कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. आगीत घर जळाल्याने भगत कुटुंबिय तात्रपडीचा पाल उभारुन सध्या राहत आहेत. शासनाकडून त्यांना अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. अखेर सामाजिक बांधिलकी जोपासत नगर पंचायतचे अध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांनी स्वखर्चातून १८ टिनपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे व अन्नधान्य सदर कुटुंबियांना दिले. अचानक लागलेल्या आगीत भगत कुटुंबाचे सुमारे आठ-दहा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तात्काळ शासकीय मदत मिळणे क्रमप्राप्त असताना त्यांना कुठलीही मदत अद्यापही मिळाली नाही. परिणामी, त्यांचा संसार उघड्यावर आला. भगत कुटुंबियांना मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे अध्यक्ष डॉ. जयस्वाल यांनी पुढाकार घेत त्यांना मदत केली. यावेळी अली शहा, लक्ष्मी डोंगरे, मंगेश वानखेडे, कल्पना कारवटकर, जि.प.चे माजी सदस्य निलीमा दंढारे, अशोक दंढारे, विठ्ठल झाडे, भीमराव सांगोळकर, धर्मेद्र जवादे, डेनी महाराज आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत
By admin | Published: May 01, 2017 12:37 AM