वर्धा : शहरात इंग्रज काळापासून असलेल्या ‘इंदिरा सागर’ या ऐतिहासिक पाण्याच्या टाकीचा अध्याय संपला. नागरिकांना सध्या या टाकीतून पाणी येत नसले तरी सिव्हील लाईन पारिसरात असलेली ही टाकी टॉवरप्रमाणे उभी राहून अनेकांचे लक्ष वेधत होती. ही टाकी तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून कामाला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. १०.५० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या टाकीतून इंग्रज काळात वर्धेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरी पाणी पुरविण्यात येत होते. ती केव्हा बनली याची माहिती पालिकेकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे. या टाकीच्या तोडण्यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक वेळा गोंधळही उडाला आहे. यामुळे तिच्या तोडण्याच्या कामाला विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही टाकी तोडण्याकरिता पालिकेच्यावतीने निविदा काढली. या निविदेत सहा लाख रुपयांचा खर्च अधोरेखीत करण्यात आला होता. त्यानुसार मागविण्यात आलेल्या निविदेत १२ लाख १२ हजार २०० रुपयाची निविदा आल्याने त्या खासगी कंत्राटदाराला तोडण्याचे काम देण्यात आले. ही रक्कम पालिकेच्या खात्यात जमा करण्यात आली.(प्रतिनिधी)
ऐतिहासिक ‘इंदिरा सागर’चा अध्याय संपला
By admin | Published: January 24, 2015 10:59 PM