लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमधील अर्धेधिक साहित्य दुकानांसमोर ठेवले जाते. हे साहित्य रस्त्यापर्यंत पसरले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहरात दुकानांची संख्या वाढत आहे. एकाच दुकानांसमोर अनेक वस्तू ठेवल्या जातात. नागरिकांचीही दुकानांत खरेदीसाठी गर्दी होते. अशावेळी जागा कमी पडत असल्याने दुकानांतील अनेक वस्तू दुकानाच्या बाहेर रस्त्यापर्यंत ठेवल्या जातात. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसून येतो. किराणा दुकानांमध्ये सिझन पाहून माल भरला जातो. शहरात ठोकमध्ये माल विकणारी काही ठराविक दुकाने आहेत. यात किरकोळ वस्तूही विकल्या जातात. यामुळे नागरिकांची अशा दुकानांत नेहमीच गर्दी असते. दुकानात जागा व्हावी म्हणून दुकानांतील अर्धेधिक साहित्य दुकानाबाहेर ठेवले जात असल्याचे दिसून येते. काही कपड्यांच्या दुकानातही हा प्रकार निदर्शनास येतो. यामुळे वहिवाटीस अडथळा निर्माण झाला आहे. शहरात सुसाट वेगाने दुचाकी दामटविणारे अनेक बाईकवेडे आहेत. यामुळे वयोवृद्ध नागरिक रस्त्याच्या कडेला चालणे पसंत करतात; पण दुकानांतील साहित्यच रस्त्यापर्यंत आल्याने रस्त्याच्या कडेला कसे चालावे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण सदर व्यावसायिक वारंवार हा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे असंतोष पसरला आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
दुकानातील अर्धेअधिक साहित्य रस्त्यावर
By admin | Published: May 07, 2017 12:46 AM