बँकेची कर्ज वसुली मोहीम जोरात : सात दिवसांच्या मुदतीवर पथक परतले वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात मंगळवारी वर्धेतील सोशालिस्ट चौक परिसरातील एका कॉम्प्लेक्समधील चार गाळे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. वसुली पथकाने गाळेधारकास कारवाईबाबत कागदपत्रे सोपवित विहित कालावधीत कजार्ची परतफेड करण्याची सूचना दिली. जिल्हा बँकेचे ३०० कोटी रुपयांवर कर्ज थकित आहे. बँकेकडून कर्ज वसुलीकरिता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील एका कॉम्प्लेक्समधील गाळेधारकाकडे २००३ पासून बँकेचे ५२ लाख ६३ हजार ३०७ रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड करण्याबाबत बँकेकडून संबंधितास वेळोवेळी सूचना देण्यात आल्या; पण कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या वसुली पथकाने दुकान गाठून जप्तीची कारवाई केली. या पथकात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक तथा अधिकृत अधिकारी संजय कोरडे, अनिल मडावी, एन.एन. संसारे, गणेश राऊत, अनिल जाधव, महेश मुळे, वाकोडकर यांचा समावेश होता. बँक अधिकाऱ्यांनी व्यावसायिकास सूचना देत गाळ्यांचा ताबा घेत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी कारवाईची कागदपत्रे व्यावसायिकास दिल्यानंतर व्यावसायिकाने सात दिवसांत कर्जाची परतफेड करण्याची हमी अधिकाऱ्यांना दिली. यामुळे अधिकाऱ्यांनी व्यावसायिकास कर्ज परतफेडीकरिता सात दिवसांची मुदत देत प्रतिकात्मक जप्तीची कारवाई केली. वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास लिलावाची प्रक्रिया होईल, असे व्यवस्थापक कोरडे यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)
सहकारी बँकेने घेतला गाळ्यांचा प्रतिकात्मक ताबा
By admin | Published: February 15, 2017 2:13 AM