वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील अनेक तलाव प्रदूषित व उथळ झाले आहेत़ यामुळे दुर्लक्षित तलावांसाठीही स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत शहरे, गावांसह नद्या स्वच्छ केल्या जात आहे़ कोट्यवधी रुपये खर्च करून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारत सरकार सरसावले आहे; पण स्थानिक प्रशासन स्वच्छेकरिता विशेष काही करताना दिसत नाही़ पवनार ग्रामपंचायतीने धाम नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविली; तेथेही कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसून आले़ प्रत्यक्षात नदीचे पात्र स्वच्छ झालेच नाही़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव प्रदूषित झाले आहेत़ हे प्रदूषण दूर करण्याकडे पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्षच केल्याचे दिसते़ वर्धा शहर हद्दीत तलाव नसले तरी जिल्ह्यात नाचणगाव येथे दोन, गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत एक, तळेगाव (टा़), मोझरी, मलकापूर यासह अन्य ग्रामीण भागात तलावांची संख्या मोठी आहे़ काही तलावांमध्ये घाण साचली आहे तर काही उथळ झाले आहेत़ या तलावातील घाण साफ करून गाळ काढणे गरजेचे झाले आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही़ यामुळे उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही़नाचणगाव येथे दोन तलाव असून एक गावाच्या मध्यभागी आहे़ या पुरातन तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने घाण साचली आहे. मलकापूर येथील तलावाचे खोलीकरण झाले नाही़ गुंजखेडा तलावात पाणी असते; पण तो उथळ असल्याने लगतच्या शेतात पाणी शिरते़ शिवाय नाल्यातूनही पाणी वाहून जाते़ तळेगाव तलावाचीही खोली वाढविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
तलावांना स्वच्छतेची प्रतीक्षा
By admin | Published: January 24, 2015 10:59 PM