ग्रामपंचायत प्रशासनाकडून नळावर मीटर लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. तसेच पाण्याच्या अतिवापरावर चाप बसणार आहे. नगर वासियांना नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार असून होणारा पाण्याचा अपव्यय टळणार असल्याने उन्हाळ्यातील पाणी समस्येवर ग्रा.पं.प्रशासनाचे हे पाऊल रामबाण इलाज ठरणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाने १४ व्या वित्त आयोग निधीतून नळावर मिटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व प्रथम अमलबजावणी आदर्शनगर मध्ये करण्यात आलेली आहे. २४७ मिटर बसविले आहे. काही लोकांनी विरोध दर्शविला. पण, लवकरच सर्वांना समान व आवश्यक पाणी मिळेल. काटकसरीने पाणी वापर व्हावा यासाठी मिटर लावण्यात येणार आहे असे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सांगण्यात आले. ग्रामस्थांना मुबलग पाणी द्या अशी मागणी जुनीच होती. परंतु, विविध कारणांमुळे नगरवासीयांची उपेक्षा पुर्ण होत नव्हती. आदर्श नगरला नेहमीच झुलते माप देण्यात आल्याचाही आरोप होत होता. परंतु, यंदा आदर्शनगरला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंततर्गत पाणी देण्यात आले आहे. घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी रहिवासीयांची आहे. डिमांड भरण्याची तयारीही नागरिकांची आहे. सध्या तरी आदर्श व सेवाभावी नगरवांसीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दोन्ही नगरात बाराही महिने पाणी मिळणार का असा सवाल विचारला जात आहे. जुनी वस्ती व ऊगले ले-आऊट या भागाला जुन्या वस्तीतील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहीरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाण्याचा होणारा अपव्यय टळणार
By admin | Published: May 07, 2017 12:44 AM