बालसंस्कार उघड्यावर : एकूण १ हजार २८१ अंगणवाडीगौरव देशमुख वर्धाजिल्ह्यामध्ये १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहेत. यातील २८८ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नसल्याची माहिती आहे. यात ११२ अंगणवाड्या व १७६ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील अंगणवाडी सेविकांची कुचंबना होत आहे. शिवाय येथे बालसंस्काराकरिता येत असलेल्या बालमनांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. केवळ स्वचछतागृहच नाही तर जिल्ह्यातील तब्बल ३८ अंगणवाड्या व १७६ मिनी अंगणवाड्यांना त्यांच्या मालकीची इमारत नाही. यामुळे येथे येणाऱ्या बालकांना कुठे बसवावे, त्यांना कुठे पोषण आहार द्यावा याचा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाड्या सुरू आहेत. ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यापर्यंत अंगणवाड्याचे जाळे पसरले आहे. कुपोषण निर्मूलनासोबतच गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी अंगणवाडी सेविका झटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडी अशा एकूण १ हजार ४५७ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ३ ते ४ वर्षापूर्वी बांधकाम झालेल्या बहूतेक इमारतींमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही तर बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील सेविकांना आसपासच्या घरांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांची कुचंबना होते; मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत काही महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नित्याप्रमाणे निधी नसल्याचा पाढा वाचण्यात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आहे.
जिल्ह्यातील २८८ अंगणवाड्या शौचालयाविना
By admin | Published: April 11, 2016 2:10 AM