लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर शहराच्या मागील २५ वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरलेल्या वाहतूककोंडीच्या सोडवणुकीसाठी शहरात गुरुवारपासून कडक अंमलबजावणी करण्याची घोषणा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केली आहे. मात्र, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मागील २० वर्षांपासून झालेल्या बैठकीप्रमाणेच ही बैठकही नावापुरती ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
पालघरमधील वाहतूककोंडीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आतापर्यंत १२ ते १५ वेळा नगर परिषद, लोकप्रतिनिधी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी विभाग, रिक्षा युनियन, व्यापारी संघटना आदींमध्ये बैठका पार पडल्यानंतर आजही हा प्रश्न सुटलेला नाही. वाढते नागरिकीकरण आणि जिल्हा निर्मितीनंतर शहरावर वाहनांचा वाढता भार यामुळे वाहतूककोंडीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. पालघर-माहीम रोड, पालघर-मनोर रोड या दोन रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होत असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन, सहा आसनी रिक्षा, मोटारसायकली, चायनीज-वडे विक्रेत्यांच्या हातगाड्या, भाजी विक्रेते, मासे विक्रेते आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवारी पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी स्वा ठरणाऱ्या बाबींविरोधात कडक कारवाईला सुरुवात होणार असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केली.
रेल्वेस्थानकाजवळील पोलीस चौकी आणि हुतात्मा स्तंभ येथील विद्युतखांब काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कचेरी रस्त्याकडे जाणारी, देवीसहाय रस्त्याकडे जाणारी आणि कचेरी रस्त्यावरून माहीम रस्त्याकडे जाणारी वाहने टर्न फ्री करण्यात आली आहेत.
१०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी माहीम व मनोर या प्रमुख मार्गांवर १०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी घालण्यात आली असून संपूर्ण परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. इतर फळे, फुले, भाजीपाला विक्रीसही बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावर बसणाऱ्या फळ, भाजीपाला, मासे विक्रेत्यांना पूर्वेला अथवा कचेरी रोड, लोकमान्यनगर येथील मोकळ्या जागेत बसण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.