पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत जवारलाल नेहरू ट्रस्ट व महाराष्ट्र शासनामध्ये सामंजस्य करार करताना स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात माजी राज्यमंत्री मनिषा निमकर यांनी या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना दिले.सन १९९७ मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या काळात वाढवण बंदर उभारण्याच्या हालचाली सुरू असताना डहाणू, पालघर तालुक्यातील मच्छीमारांसह सर्व नागरिक, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याला विरोध केला होता. तत्कालीन राज्यमंत्री मनिषा निमकर यांनीही यासंदर्भात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची भेट घेऊन लोकांच्या भावना समोर मांडल्या होत्या. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते. असे असताना त्याच युती सरकारने पुन्हा वाढवण बंदरच्या प्रकल्प उभारणीस पाठींबा देत सामंजस्य करार केल्याने युतीसरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत स्थानिकामधून तीव्र भावनाव्यक्त केल्या जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील असलेला डहाणू तालुका व तारापूर अणुउर्जा प्रकल्पाला भविष्यात वाढणारा धोका पाहता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात किनारपट्टीभागातून आंदोलनाच्या तयारीसाठी बैठका होत आहेत.
वाढवण बंदर पुन्हा उभारण्यास भूमिपुत्रांचा विरोध
By admin | Published: June 08, 2015 10:57 PM