ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १६ - वसई विरार महापालिका निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बाजून कौल दिला असून बविआने निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेला धोबीपछाड केले आहे.
वसई विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी रविवारी मतदान झाले असून ४८.८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम या ज्येष्ठ सेना नेत्यांची प्रचाराची धुरा सांभाळल्याने बविआसमोर आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे हितेंद्र ठाकूर वसई विरारचा गड राखतात की वसई विरारवरही भगवा फडकतो याविषयी कमालीची उत्सुकता होती. ११५ पैकी ४ जागांवर बविआचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून सोमवारी होणा-या मतमोजणीत १११ जागांसाठी चुरस होती. मंगळवारी सकाळी १० वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने विजयी आघाडी घेत शिवसेनेला धूळ चारली. बविआला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिवसेनेला ६, भाजपा व काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजय मिळाला आहे.