कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात वीज बिल वसुलीला ‘ब्रेक’ लागला होता. परिणामी, मार्च २०२१ पर्यंतच जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा ५० कोटींपेक्षा अधिक झाला. त्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतील थकबाकीची भर पडून ७२.३५ कोटींची थकबाकी झाली. त्यात प्रामुख्याने वाशिम तालुक्यातील ग्राहकांकडे २१.३२ कोटी, कारंजा १५.४८ कोटी, रिसोड ११.९४ कोटी, मालेगाव ८.८९ कोटी, मंगरुळपीर ७.९५ कोटी आणि मानोरा तालुक्यातील ग्राहकांकडे ६.७७ कोटींचे विद्युत देयक थकीत झाले होते.
दरम्यान, १ जूनपासून कोरोनातून दिलासा मिळताच महावितरणनेही विद्युत देयक वसुलीची धडक मोहीम हाती घेतली. यासाठी जिल्हाभरात स्वतंत्र पथके तैनात करून देयक अदा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची वीज तोडण्याचीही कारवाई करण्यात आली. यामुळे ७२.३५ कोटींपैकी १०.८२ कोटी रुपये वसूल झाले, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
...................
थकबाकी वसुलीचे प्रमाण अल्प (आकडेवारी कोटीत)
वाशिम तालुका - २१.३२/३.९२
कारंजा तालुका - १५.४८/ २.५२
रिसोड तालुका - ११.९४/ ०.९३
मालेगाव तालुका ८.८९/ १.१९
मंगरुळपीर तालुका - ७.९५/ १.४६
मानोरा तालुका - ६.७७/ ०.८०
..................
कोट :
जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक ग्राहकांसह शहरी भागातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांसाठी पुरविल्या जाणाऱ्या विद्युत देयकांची थकबाकी ७२.३५ कोटींवर पोहोचली होती. त्यापैकी जून महिन्यात १०.८२ कोटी वसूल झाले. थकबाकीदार ग्राहकांनी देयक अदा करून महावितरणला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
- आर. जी. तायडे कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.