कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रांचा वापर वाढला असला, तरी आजही शेती बैल आणि परंपरागत कृषी साहित्याशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या पूर्वजांनी शेतीला माता मानले असून, शेतीसोबतच शेती कसण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बैलांची आणि कृषी साहित्यांची पूजाअर्चा करण्याची आपल्या पूर्वजांची पद्धत आजही शेतकरी पवित्र भावनेने अनुसरतो आहे.
हंगामातील पेरणीच्या पहिल्या दिवसाला तास काढणे म्हटले जाते. हा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतो. शेती पेरण्यासाठी तिफणीचा आणि इतर साहित्यांचा वापर केला जातो. पेरणीच्या पहिल्या दिवशी आणि ज्या दिवशी पेरणी संपली, त्या शेवटच्या दिवशी तिफण व पेरणीचे सगळे साहित्य आणि बैलांची विधिवत पूजा, अर्चना करून पुरणाचे नैवेद्य दाखविले जाते. यावेळी शेतकऱ्यांकडे कामाला असलेले सालदार, महीनदार, रोजदार व पेरणीसाठी मदत केलेल्या सगळ्या लोकांना तिफण उताऱ्यानिमित्त पुरणपोळीचे गोड जेवण दिले जाते. आता मानोरा तालुक्यातील बहुतांश पेरण्या आटोपल्याने तिफण उताऱ्याची लगबग सुरू असून, तालुक्यात बऱ्याच गावांत यानिमित्त पुरणपोळीचे जेवण देऊन पेरणीची सांगता केली जात आहे.
--------------------------------------------
मानोरा तालुक्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी
मानोरा तालुक्यात यंदा जवळपास ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विविध बियाण्यांची पेरणी यंदा झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांवरच शेतकऱ्यांनी भर दिला आहे. खरीप पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे. पेरण्या आटोपल्याने ग्रामीण भागात घराघरांमध्ये तिफण उताऱ्याची लगबग तिफण उताऱ्यानिमित्त पुरणपोळीचे जेवण देऊन केली जात आहे.
--------------------------------------------
कृषी संजीवनी मोहिमेला वेग
तालुक्यात खरीप पेरणी आटोपत असतानाच कृषी विभागाने कृषी संजीवनी मोहिमेला वेग दिला आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीबीएफ यंत्राचा वापर, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, कडधान्य व तेलबीया क्षेत्रात आंतरपीक तंत्राचा वापर, विकेल ते पिकेल अभियान, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत कृषी विभागाचे कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत.