काजळेश्वर येथील पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीवरून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, त्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत देयकांची १७ लाखांची रक्कम ग्रामपंचायतीने अदा केली नाही. यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह वापरावयाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. महिला व लहान मुलांना हंडा, बादली घेऊन विहीर, कूपनलिका, हातपंपांवर धाव घ्यावी लागत असून त्या ठिकाणी उन्हातान्हात तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने महावितरणने आकारलेले तथा थकीत असलेले विद्युत देयक अदा करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
....................
बाॅक्स :
नवीन विंधन विहिरीवरून मिळाले केवळ आठ दिवस पाणी
काजळेश्वर येथे दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. ही समस्या सोडविण्याकरिता ग्रामपंचायतीचे प्रशासक व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन यंदा गावात नवीन विंधन विहीर तयार केली; मात्र त्यावरून केवळ आठ दिवस पाणी मिळाले. त्यानंतर महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला. गावात पाणी पुरवठ्यासाठी इतर कुठलाही स्रोत नसल्याने ग्रामपंचायतीने तत्काळ विद्युत देयक अदा करून प्रश्न निकाली काढणे आवश्यक ठरत आहे.
.................
कोट:
ऐन उन्हाळ्यात काजळेश्वर येथे पाणी पुरवठा ठप्प होण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासकांशी चर्चा करू. सोबतच महावितरणालाही विनंती करून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू.
नितीन उपाध्ये
ग्रा.पं. सदस्य, काजळेश्वर