नंदकिशोर नारे / वाशिमशहरी व ग्रामीण भागातील बालमजुरीला आळा बसावा, यासाठी शासनाने १९८६ साली बालमजुरी कायद्याची स्थापना केली; मात्र या बालमजुरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे बालमजुरांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये अकोला नाका ते पाटणी चौककडे जाणार्या रस्त्यावर चक्क बालमजूर काम करताना दिसून येत आहेत.शासनाने १४ वर्षाच्या खालील मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये व त्याचे जीवन सुदृढ व्हावे, यासाठी त्यांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे पालन व्हावे, यासाठी शासनस्तरावर कठोर नियम केले आहेत; मात्र या कायद्याने ठरवून दिलेल्या आदेशाची योग्य त्या प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याने आजही हॉटेल्स, वीटभट्टी, मोटारसायकल दुरुस्तीची कामे, घरगुती कामाकरिता बालमजुरांचा राजरोसपणे वापर होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. शासनाच्या नियमानुसार समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन याविषयी तक्रार दिल्यास बालकामगार ठेवणार्या व्यक्तींवर कारवाई करता येते; मात्र स्थानिक पातळीवर यासाठी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे याप्रकरणी कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई करणे कठीण बाब असते; मात्र या कायद्याबाबत शासन स्तरावरील वरिष्ठ अधिकार्यांनी जाणिवजागृती करुन या कायद्याबाबत विविध सामाजिक उपक्रमातून माहिती दिल्यास बालमजुरीला काही प्रमाणात आळा बसू शकतो; परंतु याबाबत जिल्ह्यात जाणिवजागृतीचा मोठा अभाव असल्याने बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे ज्ञान तळागाळा तील लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही कंत्राटदार बालमजूर कमी पैशामध्ये मिळतात म्हणून त्यांचा वापर करताना दिसून येत आहेत, तर रोजगाराशिवाय उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न समोर येत असल्याने बालकामगार वाटेल ते काम करीत आहे. वाशिम शहरातील भररस्त्यावर बालकामगार दगड फोडत असताना एकाही सामाजिक संघटनेचे म्हणा किंवा संबंधित विभागाचे याकडे लक्ष अद्याप गेलेले दिसून येत नाही. बालमजुराविषयी कायद्याचे ज्ञान सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याकडे प्रशासनाचे सपसेल दुर्लक्ष होत चालले असल्याचे चित्र आहे.
बालमजुरांकडून दगड फोडण्याचे काम
By admin | Published: December 12, 2014 12:39 AM