वाशिम, दि. ११- विनयभंगाच्या गुन्ह्यामधून सुखरूप सुटला तरी तुला जीवाने मारून टाकू, अशा आशयाची धमकी दिल्यामुळे बाश्रीटाकळी तालुक्यातील एका युवकाने घाबरून जाऊन काटा रोड रेल्वे स्टेशन परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, ११ मार्चला सकाळी १0:३0 वाजता उघडकीस आली. चौहोगाव (ता. बाश्रीटाकळी जि. अकोला) येथील २८ वर्षीय युवक नीलेश गोवर्धन इंगळे याच्याविरुद्ध गावातीलच एका तरुणीने बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. विनयभंगाची केस सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे. ही केस सुरू असताना ९ मार्च रोजी युवतीचा भाऊ गजानन विश्वनाथ काळे, सुनील विश्वनाथ काळे, महादेव गंगाधर गालट व गंगाधर गालट यांनी नीलेश इंगळे याला म्हटले की, तू केसमध्ये सुटला तरी तुला आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून नीलेश इंगळे हा काटा रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शनिवारला सकाळी पोहोचला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या नातेवाइकाला भ्रमणध्वनीद्वारे कुठे व का आत्महत्या करीत आहो, याची कल्पना देऊन झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन इंगळे यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीहून पोलिसांनी गजानन काळे, सुनील काळे, महादेव गालट व गंगाधर गालट या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने युवकाची आत्महत्या!
By admin | Published: March 12, 2017 1:56 AM