राळेगाव व कळंब तालुका : समन्वयाच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाराळेगाव : प्रशासन एकीकडे दुष्काळाशी लढण्याचा सामना करीत आहे. पाणीटंचाई, जलशिवार, जलसंधारणाची कामे, रोजगार आदींमध्ये शक्ती लावत असतानाच दुसरीकडे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाळ्यात संभावित नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासही तयारी करीत आहे. नैसर्गिक आपत्ती दरम्यान जीवित हानी आणि वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना, आपत्ती काळात मदत घेण्यासाठी संबंधितांची अद्यावत यादी, संपर्क क्रमांकाची पडताळणी, पूरग्रस्त गावांची यादी तयार करून पोलीस ठाणे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना पुरविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी राळेगाव व कळंब तहसीलदारांना दिले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना समन्वयाच्यादृष्टीने यासंदर्भात सूचना आणि दक्षतेचे निर्देश दिले आहेत. दोन्ही ठिकाणचे गटविकास अधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनाही पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित होऊन गावात रोगराई पसरणार नाही याची खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची सभा घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याबाबतची माहिती घेऊन पूर्व तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे रुग्णालयात अँटीव्हेनम लस उपलब्ध असल्याबाबतची खात्री करून घेण्याबाबतचे सूचित केले आहे. संबंधित महत्त्वपूर्ण अधिकारी, अधिनस्त कर्मचारी या काळात सर्व दिवस हजर राहतील, त्यांचे मोबाईल सुरू राहतील याबाबतची खात्री करून घ्यावी, आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. पाणीटंचाईचा आढावा घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे. जलयुक्त शिवारची कामे गुणवत्ता राखून जलदगतीने पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कळंब आणि राळेगाव या दोनही तालुक्यात आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आवश्यक त्या सूचना सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनाही करण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
प्रशासनाची आता आपत्ती निवारणासाठी तयारी
By admin | Published: May 30, 2016 12:06 AM