लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा सतत हजाराच्या खाली येत आहे. मंगळवारीही दिवसभरात ७२७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. तर तब्बल ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र मंगळवारी आणखी १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला. विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारीही कोरोनाने प्रत्येकी १५ बळी घेतले. मंगळवारी दगावलेल्या १५ जणांमध्ये ३४ व ४२ वर्षीय दोन तरुणांसह १३ वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ८४, ६५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५० वर्षीय महिला, तालुक्यातील ५७, ९० वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६७ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील ३४, ७८ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६३ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६५ वर्षीय महिला आणि चंद्रपूर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. पाॅझिटिव्ह आलेल्या ७२७ जणामध्ये ४५८ पुरुष आणि २६९ महिला आहे. त्यात यवतमाळ १५५, वणी ८४, दिग्रस ८३, दारव्हा ८१, पुसद ७०, झरी जामणी ५४, पांढरकवडा ३१, बाभूळगाव २९, राळेगाव २५, नेर २४, मारेगाव २३, महागाव २१, घाटंजी २०, उमरखेड १९, कळंब ११, आर्णी ६ आणि अन्य शहरातील ११ रुग्णांचा समावेश आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत पाच लाख ४४ हजार ८४६ नमुने तपासण्यात आले. यापैकी पाच लाख ४२ हजार ९७७ अहवाल आले असून १८३९ अप्राप्त आहे.
६८५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह - मंगळवारी ७५१८ अहवालांपैकी ६८५१ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत ४३३६ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह आहेत. त्यापैकी २०७१ रुग्णालयात तर २२६५ गृहविलगीकरणात आहे. आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ हजार ९४८ तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ हजार ९६२ आहे. दरम्यान १६५० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट १२.६६ इतका असून कोरोनाचा मृत्यूदर २.४९ इतका आहे.