यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी कार्यशाळा येथे घेण्यात आली. सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळ नरवेलचे उपाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आपत्ती आल्यास त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे कौशल्य आपल्यामध्ये विकसित करता आले पाहिजे. संकटाचा सामना करणारे सुजाण युवक निर्माण करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे, असे प्रा.डॉ. विलास सपकाळ यावेळी म्हणाले. आपत्ती आल्यास प्रतिबंध कसा करता येईल आणि काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबतचे विचार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम दरणे यांनी मांडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी मिनल जगताप यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. गैरसमज व अंधश्रद्धेमुळे साप कसे बळी जातात याबाबत सर्पदंश व प्रथमोपचार या विषयावर प्रा. श्याम जोशी, दिवाकर तिरमारे, आकाश पसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जिल्हाभरातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रास्ताविक रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. कमलदास राठोड, संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम दरणे, आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र उमरे यांनी मानले. यावेळी रासेयो क्षेत्रिय समन्वयक प्रा. अनिल काळबांडे, प्रा. माधुरी राखुंडे, प्रा. राचलवार, प्रा. रत्नदीप गंगाळे, प्रा. प्रदीप जयस्वाल, प्रा. बत्तलवार उपस्थित होते. (वार्ताहर)
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
By admin | Published: June 01, 2016 12:13 AM