वन विभागाचा उपक्रम : वॉकिंग, जॉगिंग ट्रॅकसह प्राणायामाची सोयदारव्हा : शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ वन विभागाने चार हेक्टर क्षेत्रावर वन उद्यान विभागाने चार हेक्टर क्षेत्रावर वन उद्यान तयार केले आहे. नागरिकांच्या सोयीकरिता या ठिकाणी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहे. यवतमाळ तसेच दिग्रस राज्य मार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हिरव्यागार व विविध वनस्पतीने सजलेल्या या वन उद्यानामुळे दारव्हा शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे.या ठिकाणी वॉकिंग, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणी, खास करून महिलांकरिता वेगवेगळी मनोरंजनाची सोय, योगा, प्रामाणायाम याकरिता चार मोठे पगोडे विद्यार्थ्यांना वनस्पतीचे ज्ञान मिळावे, यासाठी विविध औषधी व इतर प्रजातीच्या वनस्पतीची लागवड यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.सुदृढ आरोग्यासाठी वॉकिंग, रनिंग, योगा, प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु याकरिता यापूर्वी दारव्हा येथे सुरक्षित ठिकाण नव्हते. त्यामुळे नाईलाजाने आरोग्याची काळजी घेणारे नागरिक विविध रस्त्यांचा वापर करीत होते. पण यामध्ये त्यांना रिस्क घ्यावी लागत होती. अनेकदा फिरायला जाणाऱ्यांचे अपघातसुद्धा झाले आहे. त्यामुळे यासाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती.जिल्हा नियोजन समितीमध्ये दारव्हा येथील वन उद्यानाला मंजुरात मिळाल्यानंतर उपविभागीय वनाधिकारी राहुल गवई, वन परिक्षेत्र अधिकारी पी. व्ही. नाल्हे, क्षेत्र सहाय्यक ए. आर. धोत्रे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उद्यानाच्या उभारणीचे नियोजन केले. कक्ष क्र.११७ मध्ये चार हेक्टर जागेवर काम सुरू करण्यात आले. या जागेत असलेल्या तलावाकाठी मातीची मोठी भिंत तयार करून पाणी अडविण्यात आले. त्यानंतर १२५ प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात आली. सोबतच सव्वा किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक, चार पगोळे व इतर बांधकाम करण्यात आले. लहान मुलांना खेळण्याकरिता स्वतंत्र जागा तयार करून त्या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी आणण्यात आली. संपूर्ण ट्रॅकवर सौरऊर्जेवरील दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. सर्व वृक्षांना व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी ड्रिपची व्यवस्था करण्यात आली. व्यवस्थित नियोजनामुळे चांगल्या प्रकारचे वन उद्यान तयार झाले असून शहरातील पुरुष, महिला, लहान मुले, उपयोग घेत आहे. सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी प्रचंड गर्दी पहायला मिळते. ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व लहान मुलांकरिता हे सुरक्षित ठिकाण समजले जाते. औषधी वनस्पती व १२५ जातीच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्यामुळे निसर्गावर प्रेम करणारे व वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे चांगले ठिकाण आहे. यावर्षी इथे ५७ शाळांनी भेट दिली. त्यामुळे वन उद्यानामुळे शहराकरिता चांगली सुविधा उपलब्ध झाल्याची शहरवासीयांची प्रतिक्रिया आहे. (तालुका प्रतिनिधी)मेंटनन्सकरिता निधीची कमतरताकाही सुविधा वगळता वन उद्यानाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु उद्यानाच्या मेंटनन्सकरिता निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात येते. वन व्यवस्थापन नागरी समितीने उत्पन्नाची साधने तयार करून त्यामधून मेंटनन्सचा खर्च करावा असे वन विभागाला अपेक्षित आहे. परंतु सध्यातरी ते शक्य झाले नाही. मध्यंतरी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुलांची खेळणी, इतर सुविधा व मेंटनन्सकरिता पैसे उपलब्ध करून दिले. परंतु कायमस्वरूपी व्यवस्था मात्र झाली नाही.टँकरने जगविली झाडेउद्यानातील तलाव आटले, बोअरवेल खोदली पण पाणी लागले नाही. अधिकाऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरीकडून पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. पाण्याअभावी कडक उन्हात झाडे सुकू लागली असताना क्षेत्र सहायक ए.आर. धोत्रे यांनी टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन करून झाडे जगवली. याचबरोबर पक्ष्यांना पाणी मिळावे, याकरिता ७० कुंडी उद्यानात ठेवण्यात आल्या. या कामाकरिता मॉर्निंग वॉक ग्रुप संयुक्त वन व्यवस्थापन समितीने त्यांना सहकार्य केले.
दारव्हा शहराच्या सौंदर्यात वनोद्यानाने घातली भर
By admin | Published: May 30, 2016 12:10 AM