लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येत्या दोन दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिके काढण्यासाठी धावपळ सुरू आहे.
वणी तालुक्यातील शिवारात हरभरा, गहू पिकांची कापणी आणि मळणीचे काम सुरू आहे. मजुरांअभावी काही शेतातील पिके काढण्याची कामे खोळंबली आहेत. अशावेळी १७ आणि १८ मार्चला विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अकाली पावसाने हाती आलेल्या पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे पिकांच्या कापणी, मळणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र मळणी यंत्र, मजुरांच्या कमतरतेमुळे सर्व शेतकऱ्यांची पिके काढण्याची कामे पूर्ण होणे शक्य नाही. पावसापासून पिके वाचविण्यासाठी प्लास्टीक फाळीने कापणी केलेल्या शेतमालाचे ढिगारे झाकले जात आहेत.