मंगेश वरकडजिल्हा माहिती अधिकारीपीडित महिला, मुली व बालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने नुकतेच आक्टोबर २०१३ मध्ये ही योजना सुरू केली. महिला, बालकांवर वाईट प्रसंग ओढवल्यास त्यांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यभरातील पीडित महिला तसेच मुलींना मोठा आधार मिळाला आहे. ही योजना अतिशय व्यापक आहे.निकष, नियम, अटी : महिला, बालकावर अत्याचार झाल्यानंतर तक्रारीवरून पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदतीसाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तातडीने मदत देता यावी म्हणून मंडळाची बैठक बोलावून मदत मंजूर केली जाते. पीडित महिला, बालकास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. योजनेचे स्वरूप : महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालक यांना पुन:स्थापक न्यायाची खात्री देण्यासाठी सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतंर्गत बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान २ लाख व विशेष प्रकरणामध्ये ३ लाख अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना ५० हजार इतके अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. मंजूर अर्थसहाय्य अनुदान उपलब्धतेनुसार संबंधित लाभार्थ्यास अदा केले जाते. अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यासही मदत दिली जाते. अर्ज कोठे करावा : महिला, बालकांवर अत्याचाराचे प्रकरण उद्भवल्यास त्याची पोलिसात तक्रार नोंदविली जाते. सदर प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीसाठीचा प्रस्तास संबंधित पोलीस ठाण्यामार्फत तयार केला जाते. तो प्रस्ताव त्या पोलिस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर सदर प्रस्ताव जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला जातो. संबंधित कार्यालय व संपर्क : सामूहिक विवाह सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तहसील चौक यवतमाळ येथे ९०११२९४२५१ किंवा ०७२३२-२४६९२१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.संबंधित अधिकारी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, तहसील चौक, यवतमाळ
पीडित मुलींसाठी मनोधैर्य योजना
By admin | Published: November 11, 2015 1:51 AM