वैष्णव ढाकुलकर : स्पर्धा परीक्षा हेच ध्येयआर्णी : घरी भौतिक सुखसुविधांची ददात. शिकवणी लावायला पैसा नाही. प्रसंगी महाविद्यालयातही पायी जाण्याचीच वेळ. घरी अठराविश्वे दारिद्र्ये. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्याने बारावी उत्तीर्ण करणे कठीणच. पण तालुक्यातील एका विद्यार्थ्याने याहूनही भयंकर परिस्थितीवर मात करीत ८२.३० टक्के गुण मिळविले आहेत. वैष्णव विलास ढाकुलकर असे या मेहनती विद्यार्थ्यांचे नाव आहे. आर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावरील काठोडा या छोट्याशा खेड्यात तो राहतो. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काठोडा येथून आर्णी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी तो पायी येत होता. शिक्षणासाठी पैसा लागणार म्हणून तो रोजमजुरी करायचा. वाणिज्य शाखेत शिकत असताना अभ्यासावर त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रित होते. वेळ मिळताच मजुरीचे काम करून तो शिक्षणासाठी पैसे जमवित होता. त्याचे वडील नागपूरला खासगी काम करतात. आई गावातील अंगणवाडीत काम करते. त्याचा त्रास पाहून काकाने त्याला सायकल घेऊन दिली. यापूर्वी दहावीतसुद्धा त्याने ८० टक्के गुण मिळविले होते. यापुढील शिक्षणही स्वत:च्या मेहनतीवरच घ्यायचे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनायचे, असे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. (शहर प्रतिनिधी)
मजुरी करून बारावीत मिळविले ८२ टक्के
By admin | Published: May 28, 2016 2:31 AM