अभिनव आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांची गांधीगिरीयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरणाऱ्या बळीराजा चेतना बाजारात शुक्रवारी शेतकऱ्यांनी चक्क फुकटात कांदे वाटून कांद्याला योग्य दराची मागणी केली. बैलगाडीतून आणलेला कांदा शेतकरी फुकटात वाटत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या गांधीगिरी आंदोलनाची दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा होती.शेतकऱ्यांचा कांदा निघताच बाजारात दर एकदम गडगडले. मातीमोल भावात कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. या प्रकरणी शासनाने योग्य निर्णय घ्यावा यासाठी शेतकरी वारकरी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरलेल्या बळीराजा चेतना बाजारात चक्क कांदे फुकटात वाटण्यात आले. शेतकरी सजविलेल्या बैलगाडीतून कांद्याचे पोते घेऊन आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये भाजीबाजार आणि बाहेर प्रवेशद्वारावर मोफत कांदे वितरण कार्यक्रम सुरू होता. पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांना आवाहन करीत कांदे फुकटात घेऊन जा असे शेतकरी म्हणत होते. यावेळी अनेकांना कांद्याचे वितरण करण्यात आले.या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, संयोजक अनुप चव्हाण, रोहित राठोड, सुनील लांबट, देवराव तोटे, शैलेंद्र तेलंग, कैलास फुपरे, चंद्रशेखर राऊत, विष्णू तडसे, शंकर डाखोरे, दशरथ फडके, रवींद्र डहाणे, संजय नागोसे, सुनील मडावी आदी सहभागी झाले होते. कांद्याबाबत ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. (शहर वार्ताहर)
चेतना बाजारात कांदे फुकटात !
By admin | Published: June 04, 2016 2:04 AM