जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यथा : ६३३ शिक्षक आयुक्त कार्यालयावर धडकणारयवतमाळ : १० वर्षापूर्वीच्या कृती समितीच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली. पदाधिकाऱ्यांना यात काहीच साधता आले नाही. सर्व शिक्षकांना वेठीस धरून प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली. यामुळे बदलीस पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, अशी मागणी करीत शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही आपबिती सांगितली. ६३३ शिक्षक बुधवारी आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात कृती समितीने गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यामुळे शासनाच्या अवर सचिवानी बदल्यांना स्थगिती देत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोमवारी जिल्हा परिषदेत हे पत्र धडकले होते. यामुळे चांगलेच वादळ उठले. मंगळवारी बदल्यांच्या स्थगिती प्रकरणात शिक्षकांनी कृती समिती विरूद्ध रणशिंग फुंकले. कृती समितीमधील नेत्यांना बदलीमध्ये स्वार्थ साधता आला नाही. यामुळे पारदर्शक बदली प्रक्रिया स्थगितीचे कारस्थान रचल्याचा आरोप शिक्षकांनी केला. व्हिडीओ चित्रीकरण, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया झाली. ३२ वर्षांपासून तालुका न बदल झालेल्या शिक्षकांना तालुका बदलून मिळाला होता. बदलीस पात्र शिक्षकांपुढे पर्याय ठेवण्यात आले होते. या बदलीमध्ये नेत्यांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. शिक्षकांना न्याय मिळाला आहे. स्थगिती आणणे हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप बदलीस पात्र शिक्षकांनी केला.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे शिक्षकांनी आपबिती मांडली. कृती समिती १० वर्ष जुनी आहे. यामध्ये एकाच शाळेतील तीन शिक्षक पदाधिकारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणात ६३३ शिक्षक बुधवारी अमरावती आयुक्तापुढे आपली तक्रार मांडणार आहे. याविषयाचे निवेदन सादर करताना दिवाकर राऊत, सचिन शिंदे, आसाराम चव्हाण, प्रकाश सरताबे, सुहास लांबाडे, बादल धाबर्डे, निलेश श्रृंगारे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
आमच्या बदल्या पारदर्शकच झाल्या
By admin | Published: June 01, 2016 12:21 AM