लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सध्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे वारे वाहत आहे. पाच वर्षे कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. मात्र, संलग्नचा आधार घेऊन पाचपेक्षा अधिक वर्षे एकाच ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना हलविले जाणार काय, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.
या तीन ठाण्यांना पसंती
वणी : येथील पोलीस ठाणे वरकमाईसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिकारी असो की कर्मचारी त्यांची पहिली पसंती वणी पोलीस ठाण्यालाच असते. हे ठाणे मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. यवतमाळ : यवतमाळ मुख्यालयी राहून कुटुंबासोबत दिवस काढता यावेत याकरिता संलग्नचा खटाटोप केला जातो. बरेच जण मुख्यालयी राहून आपले इतर व्यवसायही सांभाळताना दिसतात. वाहतूक शाखा : काहींनी अनेक वर्षे वाहतूक शाखेत काढली आहेत. त्यांनी स्वत: नव्हे मात्र नातेवाइकांच्या नावाने वाहतुकीचा पूरक व्यवसायही सुरू केला आहे. काहींची ट्रान्सपोर्टिंगमध्ये गुंतवणूक आहे.
या ठाण्यात नको रे बाबा !
अवधूतवाडी : जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंद होणारे ठाणे म्हणून अवधूतवाडीची ओळख आहे. या ठिकाणी जुने कर्मचारी सोडण्यास तयार नाही. मात्र, नवीन कर्मचारी तेथे येण्याचे टाळतात. येथे मुक्कामी कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. बिटरगाव : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचे पाेलीस ठाणे म्हणून बिटरगाव ओळखले जाते. सोयीसुविधांचा येथे तुलनेने अभाव आहे. यवतमाळात स्थायिक झालेल्यांना या ठिकाणी जाण्याची ॲलर्जीच आहे.खंडाळा : जिल्ह्यातील दुसऱ्या टोकावर असलेले खंडाळा पोलीस ठाणे हे अनेकांना नको असते. दुर्गम भाग असल्याने येथे कुणीही जाण्यास तयार होत नाही. तेथे झालेली बदली रद्द करण्याचाच प्रयत्न केला जातो.