राजू साळुंखे हे ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातून त्यांच्यासह इतरांविरुध्द हल्ला केल्याप्रकरणी ३२३, ४४८, ५०६ कलमानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांनी १० हून अधिक कामगार व मजूर कामावर असताना त्यांच्यासह ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी अॅड. ज्ञानेंद्र यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपी राजू मल्हारी साळुंखे, रा. वसंत नगर याच्याविरुध्द भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद झाला. मात्र, अटक टाळण्यासाठी आरोपींनी ३० दिवस रूग्णालयात काढले. नंतर त्यांना सशर्त जामीन मिळाला. त्यात न्यायालयाने काही अटी घातल्या. १६ मार्च २०२१ रोजी आरोपींनी घटनास्थळी भेट देऊन अटींचे उल्लंघन केले. त्या आधारे फिर्यादीने पुसद सत्र न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अर्ज दिला होता. बुधवारी हा अर्ज स्वीकारत न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला आणि वसंतनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.