अहवाल पाठविला : सामाजिक न्याय विभागाच्या हालचालीयवतमाळ : वाढत्या माहागाईचा सामना करणाऱ्या निराधारांना दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मानधनवाढीच्या दृष्टीने अहवाल मागविला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील ३१ हजार लाभार्थ्यांचा अहवाल जिल्ह्याने पाठविला आहे. यामध्ये वाढीव मानधन केल्यास किती रूपये लागतील याची गोळाबेरीज पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. यामध्ये संजय गाधी निराधार योजनेत ३१ हजार लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, विधवा, परितक्त्या, अनाथ मुलासोबत, शेतकरी विधवांचाही समावेश आहे.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. यासाठी लाभार्थी कुटुंबाचा अहवाल जिल्ह्यातून मागविण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण बायोडाटा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. लाभार्थ्यांच्या कुटुुंबात किती सदस्य आहेत. त्यामध्ये लाभार्थी अनाथ असेल तर ७५० रूपये, एक आपत्य असेल तर ८५० रूपये आणि दोन आपत्य असतील तर १००० रूपये मानधनाची शिफारस करण्यात आली. पूर्वी या लाभार्थ्यांना ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते. वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)
निराधारांचे मानधन वाढणार
By admin | Published: June 01, 2016 12:19 AM