जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : सीएसआर अंतर्गत कामे करण्यावर भर, खाणींची तपासणी त्रयस्त यंत्रणेद्वारा होईलयवतमाळ : राष्टाच्या विकासासाठी खनिज संपत्ती आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त गावांनी या परिसरात असलेल्या खाणींना सहकार्य करावे, प्रकल्पग्रस्त गावाच्या समस्यांची जाणीव असून याठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा दर महिन्याला आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.साखरा, मुंगोली आणि इतर गावातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वणी तालुक्यात दौरा केला. यात साखरा येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, वेस्टर्न कोलफिल्डचे उपप्रबंधक अजय सिंह आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेची माहिती दिली. जिल्ह्यात १५५ गावांमध्ये ही कामे सुरू असल्यामुळे प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेसाठी या पुरक ठरतील, यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे जलपुनर्भरणासाठी वेस्टर्न कोलफिल्डने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाणीचा विकास होत असताना ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या आहेत, त्यांच्या विकासासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. चांगल्या पद्धतीने पुनर्वसन झाल्यास नागरीकही नव्याने येणाऱ्या प्रकल्पांना सहकार्य करतील, ज्यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होईल.सीएसआर अंतर्गत कामे करणारखाणींना सीएसआर अंतर्गत कामे करावी लागतात. या निधीअंतर्गत प्रामुख्याने पिण्याचे पाणी, शौचालय आणि जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. या परिसरातील खाण कंपन्यांना सीएसआरअंतर्गत करावयाची कामे प्रकल्पग्रस्त भागात करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही सिंह यांनी सांगितले.गावाजवळ असलेल्या खाणी नियमांचे पूर्णपणे पालन करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंगोली गावालगत असलेल्या कोळसा खाणीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. खाणीमुळे गावाला धोका निर्माण होत असल्याची तक्रार गावातील नागरीकांनी केली. याबाबत त्रयस्थ यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येऊन प्रमाणिकीकरण करण्यात येईल. यात गावाला धोका असल्यास गावाचे पुनर्वसन तातडीने करण्यावर भर देण्यात येईल. गावातील नागरीकांनी शेतजमिनी जवळ असल्याने परिसरातच पुनर्वसन करण्याची मागणी केल्यानंतर शिंदोला येथील खासगी जमिन उपलब्ध झाल्यास शासनातर्फे निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)प्रकल्पातील गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाखाणीमुळे गावातील हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे वेस्टर्न कोलफील्डच्या वतीने टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. हे पाणी अशुद्ध असल्याने प्रकल्पग्रस्त गावात शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी मुंगोली येथेही नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी पाणी, धुळ, खाणीतील स्फोटामुळे होणारे घराचे नुकसान आदी समस्यांची माहिती दिली. मुंगोली येथील वेस्टर्न कोलफिल्डने अजस्त्र डगलॅण्ड विषयी माहिती दिली. या मशिनचा वापर बंद करावा, अशा सुचनाही गावकऱ्यांनी यावेळी केली. खाणीमधील पाणी बाहेर सोडण्यापेक्षा त्याचा वापर शेतीसाठी किंवा पुनर्भरणासाठी केल्यास त्याचा गावातील नागरिकांना फायदा होईल, असे सांगितले. खाणीतील पाणी सोडताना शेतपिकांचे नुकसान होऊ नये याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा आढावा दर महिन्याला घेणार
By admin | Published: May 30, 2016 12:17 AM