पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड बनले रुपेश उत्तरवार यवतमाळपर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पर्यावरणाशी समरस झालेली काही गावे आदर्श म्हणून पुढे आली आहेत. यवतमाळ वनवृत्तातील पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड गाव वनग्राम म्हणून घोषित झाले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबात आज गॅस सिलिंडर आहे. त्याचा नित्यनियमाने वापर झाल्याने हे गाव निर्धुर ग्राम बनले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०४० गावांपैकी आर्णी तालुक्यातील पिंपळनेर, यवतमाळ तालुक्यातील सायखेडा बंदी आणि नेर तालुक्यातील मालखेड खुर्द या गावांनी एक नवा आदर्श जिल्ह्यापुढे निर्माण केला आहे. २०१४ पासून या गावांचा कायापालट झाला आहे. ही गावे जंगलात असली तरी यांच्याकडे जलतनासाठी लाकूड वापरले जात नाही. त्याऐवजी आता गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे.त्याकरिता ग्रामसभेने ठराव घेतला आणि संपूर्ण गावाने सिलिंडर वापरण्याचा निर्णय घेतला. वनविभागाने यासाठी गावाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये २५ टक्के निधी लाभार्थी आणि ७५ टक्के वाटा वनविभागाने उचलला आहे. यामुळे आज या ठिकाणी घरोघरी सिलिंडर दिसतात. यातून संपूर्ण गाव निर्धुर झाले आहे. गाव इतक्यावरच थांबले नाही, तर गावाने कुऱ्हाड बंदी, चराई बंदी आणि वनव्यापासून सदैव जंगलांना वाचविण्याचे काम केले आहे. जंगलाप्रती त्यांच्यामध्ये असलेले उत्कट प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येते. यासोबतच गावकऱ्यांनी जंगलामध्ये वृक्षलागवड केली आहे. आज जंगलातील हे टुमदार गाव पर्यटनस्थळालाही लाजवेल असेच आहे. या ठिकाणी मोर, लांडोर, हरिण, नीलगाय आणि इतर प्राणी जवळून पाहायला मिळतात. जणू हे प्राणी आणि ग्रामस्थ एकाच परिवारातील असावे असाच अनेकवेळा भास होतो. त्यांनी हाती घेतलेला पर्यावरण संवर्धनाचा विडा अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
निर्धुर ग्राम
By admin | Published: June 05, 2016 2:09 AM